स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिजनल रिसोर्स अँड ट्रेनिंग सेंटरच्या अंतर्गत सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज यांच्या संयुक्त विद्यमाने “पिढी-पिढीतील स्नेहबंध मेळा” (Intergenerational Bonding Mela) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या समाजात एकत्र कुटुंबपद्धती मुळे एकमेकांत सुसंवाद होता, आत्मीयता होती. परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या पिढ्या एकमेकांपासून दुरावत चालल्या आहेत, असे चित्र समाजात पाहायला मिळत आहे. हा पिढ्यांमधला संवाद हरवू नये, या जाणिवेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात डॉ. विनोदिनी प्रधान, मनीषा कोटक, डॉ. रेखा भातखंडे, डॉ. अविनाश फाटक, डॉ. रमेश पोतदार, जी.जी. पारेख या सहा ज्येष्ठ नागरिकांचा सामाजिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल ग्रंथ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
स्वामी विरंगुळा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांनी ऑर्केस्ट्रा सादर केला. अजय पानवलकर या अंध मुलाने बासरी वादन केले. ज्येष्ठ नागरिक व युवांचा या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी मा.अॅड. निर्मलाताई सामंत, चव्हाण सेंटरचे कोषाध्यक्ष मा. हेमंत टकले, सीईओ दिप्ती नाखले, दत्ता बाळसराफ, दिपिका शेरखाने, संतोष मेकाले, राज्याच्या फेसकोम संस्थेचे अध्यक्ष अरुण रोडे, अण्णासाहेब टेकाळे, मा. डिचोलकर, मा.औंधे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई: यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने स्त्री-शक्तीला सलाम करण्यासाठी मागील वर्षापासून ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’ सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजेच दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा केली.
या पुरस्कारांसाठी आजपासूनच म्हणजे १८ मार्च पासून अर्ज मागविण्यास सुरु झाले असून अंतिम मुदत ३० एप्रिल २०२३ ही असल्याचे सुळे यांनी सांगितले. पुरस्काराचे स्वरुप २५ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असून पुरस्कारार्थीची घोषणा जून मध्ये करण्यात येणार आहे. देशाला पथदर्शी ठरलेले महिला धोरण महाराष्ट्रात मंजूर झालेल्या दिवशी म्हणजे २२ जून रोजी हे पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पुरस्कारांमध्ये कृषी क्षेत्रासाठी 'यशस्विनी कृषी सन्मान पुरस्कार' या नावाने दिला जाणार असून या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, शेतीत अभिनव प्रयोग करणाऱ्या शेतकरी महिलेची निवड करण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार 'यशस्विनी साहित्य सन्मान पुरस्कार' या नावाने ओळखला जाईल. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्या महिलेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रात दर्जेदार खेळाडू घडविणाऱ्या महिलेस 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येईल. तर औद्योगिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलेस 'यशस्विनी उद्योजिका सन्मान पुरस्कार' देण्यात येणार आहे.
सामाजिक क्षेत्रात विधायक व रचनात्मक कार्य करुन महाराष्ट्राच्या विकासात भर टाकणाऱ्या महिलेस 'यशस्विनी सामाजिक सन्मान पुरस्कार' प्रदान करण्यात येईल. याबरोबरच पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पत्रकारास 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार' देण्यात येणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
या पुरस्काराच्या अटी-शर्ती, नियम वाचण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या www.chavancentre.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या वेबसाईटवरच गुगल फॉर्ममध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सुळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८८११४९३९६ या मोबाईल क्रमांकावर किंवा
मुंबई: राज्यात आदिवासींची लोकसंख्या मोठी आहे. जल, जंगल आणि जमीन याचे खरे मालक आदिवासी आहेत. पण काही जण त्यांना वनवासी म्हणतात. आदिवासींना वनवासी म्हणणे हा त्यांचा अपमान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त २०२२ चा 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार' ज्येष्ठ उद्योगपती अझीम प्रेमजी यांना प्रदान करण्यात आला. प्रेमजी यांच्या वतीने के. आर. लक्ष्मीनारायण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, पाच लाख रुपयांचा धनादेश आणि यशवंतराव चव्हाण यांची प्रतिकृती असे आहे. या वेळी सेंटरच्या वतीने 'आदिवासी कल्याण केंद्राची' स्थापना करण्यात आली. या वेळी बोलताना पवार म्हणाले, आदिवासींच्या हितासाठी जे जे संघर्ष करतात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आमची भूमिका आहे. पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सामाजिक, राजकीय जीवनातील योगदानाविषयी विवेचन केले. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. गरज पडल्यावर केंद्रात गेले. तेथे संरक्षणमंत्री, अर्थमंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळली. ग्रंथ हीच त्यांची संपदा होती.
या कार्यक्रमात चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना चव्हाण साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. स्व यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्याचा प्रांजळ प्रयत्न चव्हाण सेंटर करीत आहे.
याप्रसंगी डॉ. अनिल काकोडकर, उपाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, कोषाध्यक्ष हेमंत टकले, अजित निंबाळकर, बाळकृष्ण आगरवाल, विवेक सावंत, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, डाॅ. समीर दलवाई, चव्हाण सेंटरच्या सीईओ दीप्ती नाखले, चव्हाण सेंटरचे विश्वस्त, पदाधिकारी, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.