स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘संविधान दालन’ सुरु करण्यात आले. या दालनाचे उद्घाटन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे द्यांच्या हस्ते करण्यात आले. संविधानावरील व्याख्याने, संविधान प्रश्नमंजुषा कार्यशाळा व शिबिरे अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन भविष्यात या दालनात करण्यात येईल, अशी माहिती सेंटरकडून देण्यात आली.
संविधानाची उद्दिष्टे आणि मुल्ये सर्व सामान्यांपर्यंत पोहचावीत, या उद्दिष्टाने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने संविधानिक चर्चा, व्याख्याने, शिबिरे, कार्यशाळा,संविधान परिचय वर्ग तसेच महाराष्ट्रातील शालेय शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी ऑनलाईन संविधान प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर या संविधान दालनाचे उद्घाटन केले आहे.
याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आपला देश संविधानावर चालतो. सर्वजण सद्यस्थितीबाबत बोलायला घाबरत आहेत. ईस्ट इंडियाच्या काळातील स्थिती पुन्हा एकदा येऊ लागली आहे. त्यामुळे आज संविधान समजून घेणे जास्त महत्वाचे आहे. केंद्र सरकारने सर्व शाळांना एक स्पर्धा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यात केंद्र सरकारच्या योजनांवर आधारीत चित्रे काढायची आहेत. याचा सगळा खर्च मुख्याध्यापकांना करायचा आहे. पण त्याऐवजी संविधानावर स्पर्धा घ्यावी असेही त्यांनी नमूद केले. या संविधान प्रदर्शनातून प्रचार प्रसार करण्यात येणार आहे. अनेक सुशिक्षित महिलांना देखील त्यांचे अधिकार माहित नाही. आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत संविधानाचा अर्थ पोहोचवायचा आहे. ही जबाबदारी आपण नक्की पार पाडू असा विश्वास यावेळी खासदार सुळे यांनी व्यक्त केला.
ठाणे, दि. २१ (प्रतिनिधी) - महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील रिलायन्स मॉल मध्ये बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले. महाराष्ट्रातील तब्बल ४५ बचत गटांतील महिलांना या उपक्रमामुळे हक्काची बाजारपेठ मिळाली.
चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून महीला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी यशस्विनी प्रकल्प चालू केला आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे येथील रिलायन्स मॉल मध्ये आज या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ऋता आव्हाड, रिलायन्सचे जगदीश पांचोली, पराग दळवी, वल्लभ सौदागर, पार्थ शर्मा, राहुल चौधरी, जॉन्सन जॉन, अविनाश जोशी आदी उपस्थित होते.
खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उभारलेल्या यशस्विनी सामाजिक अभियाना अंतर्गत राज्यातील हजारो महिलांनी महिला बचत गट तयार केले असून त्यामार्फत अनेक उद्योग व्यवसाय उभारले जात आहेत. या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी खासदार सुळे या प्रयत्नशील होत्या. त्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि गेल्या महिन्यात पुण्यातील कोंढवा येथील रिलायन्स मॉल मध्ये पहिले प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या प्रदर्शनाला 'सुगरण' हे एक खास नाव देण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आज ठाण्यातील प्रदर्शनात।राज्यभरातून तब्बल ४५ बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली. हा उपक्रम यापुढेही असाच चालू राहणार असून राज्यातील जास्तीत जास्त महिला बचत गट यात जोडले जाणार असून त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ आपण मिळवून देऊ, अशी ग्वाही यावेळी बोलताना खासदार सुळे यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने नव्या पिढीला वारकरी संगीताचा परिचय करून देण्यासाठी ' संतविचारांचा सुरेल आविष्कार ' हा रिंगण भजन सोहळा रविवार दि. १५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
गंगाखेड, परभणी येथील ज्येष्ठ गायिका हभप गोदावरीताई मुंडे या सोहळ्याचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. या ‘रिंगण भजन सोहळ्यास’ मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
हा कार्यक्रम अविस्मरा सेलिब्रेशन्स, अतुल नगर, वारजे, चितळे बंधू मिठाईवाले शेजारी, पुणे येथे पार पडणार आहे.
विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.