
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी)- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती- पाणी पुरस्कार २०२६ ची घोषणा आज करण्यात आली. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून मुंबई येथे सेंटरचे अध्यक्ष शरद पवार आणि जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. येत्या ११ सप्टेंबर रोजी मुंबईत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील साहित्य आणि शेती पाणी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
कविवर्य ना. धों. महानोर यांच्या स्मरणार्थ सुरु केलेल्या पुरस्कारांची घोषणा चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात आली. जळगाव येथील वैशाली प्रभाकर पाटील आणि जालना येथील सीमा क्षीरसागर यांना कविवर्य ना. धों. महानोर शेती-पाणी पुरस्कार तर मुंबई येथील अविनाश उषा वसंत, बुलढाणा येथील प्रेषित प्रदिप सिद्धभट्टी, चंद्रपूर येथील श्रीकांत साव, सातारा येथील विठ्ठल खिलारी यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला.
शेती-पाणी आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण काम करत योगदान देणाऱ्या या सर्व पुरस्कारार्थ्यांना पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अशोक जैन, डॉ. जब्बार पटेल, डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. नितीन रिंढे, शंभू पाटील, अजित भुरे, पत्रकार रमेश जाधव इत्यादी मान्यवरांच्या निवड समितीने हे पुरस्कारार्थी निवडले आहेत, असे त्या म्हणाल्या. राज्यभरातील साहित्य आणि शेती-पाणी या क्षेत्रांतून अनेक जणांच्या कार्याचा आढावा घेताल्यानंतर हे पुरस्कारार्थी निवडले असून यशवंतराव चव्हाण सेंटर आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करत आहोत, असे त्यांनी नमूद केले.
पुणे : खासदार शरद पवार यांच्या कारकिर्दीच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिपची घोषणा यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आज करण्यात आली. यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे या फेलोशिप देण्यात येत असून यंदा सहाव्या वर्षाची घोषणा सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली या फेलोशिपची सुरुवात करण्यात आली आहे. यात कृषी (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर), साहित्य (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर) आणि शिक्षण (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन) या क्षेत्रातील गुणवंतांना ही फेलोशिप प्रदान करण्यात येते.
कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती व सह्याद्री फर्म्स नाशिक तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एमकेसीएल फाउंडेशनचे सहकार्य मिळत असून कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी विवेक सावंत, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी डॉ. करुणा गोखले तर बालशिक्षण फेलोशिपसाठी नीलेश निमकर हे मुख्य समन्वयक म्हणून भूमिका पार पाडत आहेत, असे सुळे यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी आज दिनांक १२ ऑगस्ट २०२६ पासून तर कृषी, साहित्य व बालशिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर दिनांक १५ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करता येणार आहेत. १५ ऑक्टोबर २०२६ नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आलेल्या सर्व प्रस्तावांची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली १६ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत निवडप्रक्रिया पूर्ण होईल. निवडसमितीच्या वतीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर’ साठी ४०, ‘शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप’ साठी १२ अशा, शरद पवार इन्स्पायर शिक्षण फेलोशिप साठी ३० अशा तर शरद पवार इन्स्पायर बालशिक्षण फेलोशिप साठी १० अशा एकूण ९२ फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या फेलोंची घोषणा दिनांक १ डिसेंबर २०२६ रोजी फेलोशिपच्या वेबसाईटवर केली जाईल. दिनांक १३ डिसेंबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे फेलोशिप मिळालेल्या फ़ेलोंना फेलोशिप प्रदान केल्या जाणार आहेत.
ही फेलोशिप केवळ आर्थिक मदत किंवा सन्मान नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी तरुणांना मिळालेलं एक सामर्थ्यशाली व्यासपीठ असून तरुणांच्या कल्पना, ऊर्जा आणि स्वप्न या नवपरिवर्तनाच्या प्रवासात त्यांनी सामील करावेत, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
या उपक्रमाला पहिल्या वर्षापासून भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल सुळे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले असून पाच वर्षात फेलोशिप मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. ते सर्वजण अतिशय उत्तमरीत्या काम करत आहेत याचे आम्हाला समाधान आहे व त्यांचा वेळोवेळी नियमितपणे आढावा घेतला जातो. आपण आवर्जून या फेलोशिपसाठी आपले अर्ज पाठवावेत, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या यशस्विनी सन्मान पुरस्काराची घोषणा आज सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार, ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती चेतना सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला धोरणाला २२ जून रोजी ३२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे सुळे यांनी सांगितले.
आपल्या लेखणीच्या जोरावर मराठी साहित्यात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या लेखिका सुनंदा भोसेकर यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान', पर्यावरणस्नेही वैशाली घुगे यांना 'यशस्विनी कृषी सन्मान', महिलांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या मालतीताई सगणे यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान’, पत्रकार प्रगती बाणखेले यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान’, यशस्वी व्यावसायिक प्राची जागुष्टे- महाजन यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान’ आणि जिम्नॅस्टिक या खेळातील निष्णात महिला प्रशिक्षक सविता मराठे यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षीचा रेखाताई नार्वेकर पुरस्कृत 'युवा यशस्विनी पुरस्कार' ॲड. परिक्रमा खोत यांना देण्यात येणार आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी पुण्यात एस. एम. जोशी सभागृहात सकाळी साडे दहा वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या या सातजणींना पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण देशभरात महाराष्ट्र शासनाने प्रथमच १९९४ साली महिला धोरण जाहीर केले. या महिला धोरणाला यंदा ३२ वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून राज्यातील कर्तृत्ववान महिलांना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने सन्मानित करण्यात येते. राज्यभरातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता आणि क्रीडा प्रशिक्षण या क्षेत्रांतून अनेक महिलांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर वरील सात जणींचा सन्मान करण्यात येत असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या.

विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."





नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.