पुणे - महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी दिली, की महिला तिचं सोनं करतात, याची खात्री होती. म्हणूनच संपूर्ण देशभरात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरण आणले, असे सांगून महिलांचे कर्तृत्व नाकारणाऱ्या देशाची प्रगती होऊ शकत नाही, अशा शब्दात खासदार शरद पवार यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील सहा यशस्विनींचा आज लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख आणि धैर्यकन्या आसावरी जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील डाॅ. श्यामल गरुड यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान', गडचिरोली येथील मनिषा सजनपवार यांना 'यशस्विनी कृषी सन्मान', रायगड येथील उल्काताई महाजन यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान', मुंबई येथील अलका धुपकर यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान', धाराशिव येथील कमल कुंभार यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान' तर अहिल्यानगर येथील डाॅ. शबनम शेख यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान' या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सन्मानपत्र, यशवंतराव चव्हाण यांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच या कार्यक्रमात हुंडामुक्त महाराष्ट्र, हिंसामुक्त कुटुंब जागर जाणिवांचा तुमच्या माझ्या लेकींचा या राज्यव्यापी अभियानाच्या माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, अंकुश काकडे, निर्मलाताई सामंत प्रभावळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, स्वाती पोकळे, भारती शेवाळे राज्यातील चव्हाण सेंटरचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच राज्यभरातून आलेल्या महिला भगिनी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

खासदार शरद पवार यांनी यावेळी बोलताना राज्यात महिला धोरण आणताना झालेला विरोध, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि त्या सर्वांवर मात करत महिला धोरण कसे लागू केले आणि हळूहळू त्यांचा तो निर्णय कसा लोकांना आवडू लागला यावर सविस्तर विवेचन केले. त्याचबरोबर आजही महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत असे सांगताना पुरुषी मानसिकता सोडून देण्याची गरज असल्याचे मत मांडले.

लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी 'बायांनो रुसणे सोडू नका' ही कविता म्हणत महिलांच्या हक्कांवर भाष्य केले. तर आसावरी जगदाळे यांनी पहलगाम हल्ल्यावेळी आलेले अनुभव सांगताना प्रत्येकाने आपापल्या परीने देशसेवा केली पाहिजे, असे आवाहन केले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना हुंडाबळी आज देखील होत आहेत, याबद्दल खंत व्यक्त करताना समाज म्हणून आपण आत्मचिंतन केले पाहिजे, असे सांगताना हुंड्यासारख्या प्रथा नष्ट करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग असायला हवा, असे आवाहन केले. त्याचबरोबर जुलै महिन्यात हुंडामुक्त समाजासाठी महाराष्ट्रात अभियान राबवणार असल्याचे सांगितले. पुरस्कारार्थी सहाही यशस्विनीनी यावेळी पुरस्काराप्रती आपल्या भावना व्यक्त करतानाच त्या त्या क्षेत्रात त्या करत असलेल्या कामांची माहिती दिली. सेंटरचे पुणे केंद्र सचिव अंकुश काकडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. राजमाला बुट्टे पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.