
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंचच्यावतीने डॉ. कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारात एक पुरुष आणि एक महिला शिक्षक यांची निवड केली जाते. सन २०२५ चा हा पुरस्कार बुलढाणा येथील किशोर मोतीराम भागवत आणि गडचिरोली येथील विजया शरद किरमीरवार यांना जाहीर करण्यात आला आहे. किशोर भागवत हे जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, हिवरखेड, ता. खामगाव (बुलढाणा) येथे कार्यरत आहेत, तर विजया किरमीरवार या लोक बिरादारी आश्रमशाळा, हेमलकसा, ता. भामरागड (गडचिरोली) येथे सेवा देत आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणाऱ्या सोळाव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत येत्या ४ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
किशोर भागवत हे विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे आणि रंजक व्हावे म्हणून सातत्याने प्रयोगशील राहिले आहेत. विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिकण्यासाठी अॅलेक्सा, अल्फाबेट रॅक, अक्षर टोप्या, निधी बँक यांसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले आहेत. कोविड काळातील ऑनलाइन शिक्षणासाठी त्यांनी राज्यातील युट्यूबर शिक्षकांची ‘टीच-ट्यूबर’ नावाची चळवळ उभी केली. तंत्रज्ञानाबरोबरच त्यांनी आपल्यातील साहित्यिक कलेचा वापर शिक्षणात केला आहे. विविध नियतकालिकांमध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेतून कविता आणि लेखन ते करतात. कॅनडा येथे प्रकाशित आंतरराष्ट्रीय प्रतिनिधिक कविता संग्रहात तसेच इंग्रजी जर्नलमध्ये त्यांच्या इंग्रजी कविता प्रकाशित झाल्या आहेत. लोकसहभागातून शाळेचा भौतिक विकास घडवण्यासाठीचे त्यांचे विशेष प्रयत्न उल्लेखनीय आहेत. त्यांच्या शैक्षणिक धडपडीची दखल मिपा या संस्थेने घेतली होती.
विजया किरमीरवार या हेमलकसा येथील आश्रमशाळेत मागील दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. ‘३६५ दिवस सुरू असणारी शाळा’ अशी या शाळेची ख्याती आहे. त्या गणित विषयाचे अध्यापन करतात. गणिती खेळ, खरी कमाई, गणिती शब्दकोडे, गणित बाजार यांसारखे मुलांच्या आवडीचे उपक्रम त्यांनी राबविले आहेत. गणित संबोध प्रशिक्षणात त्यांनी प्रशिक्षक म्हणून कार्य केले आहे. मैदानी खेळ, बागकाम, भाजीपाला आणि शेतीकाम यातून विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अनुभूती प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे. अत्यंत दुर्गम भागात असूनही शैक्षणिक जनजागृती आणि विज्ञान प्रदर्शन यांसारख्या उपक्रमात त्या सक्रिय सहभाग घेतात. विजया किरमीरवार यांच्या कामाची दखल घेऊन ‘आदिवासी प्रकल्प विभाग, भामरागड’ यांच्यावतीने त्यांना ‘इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले आहे.
मा. भाऊ गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या निवड समितीत दत्ता वारे, अरविंद शिंगाडे, तुषार म्हात्रे, आनंदा आनेमवाड, अप्पा सावंत, वैभव तुपे, जगदीश कुडे यांसारख्या कर्तबगार शिक्षकांचा समावेश आहे. या समितीने राज्यभरातील मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पालक, शिक्षण अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्याकडून पुरस्कारासाठी शिक्षकांच्या शिफारशी मागवल्या होत्या. अनेकांकडून आलेल्या शिफारशीची छाननी करून, मुलाखती घेऊन आणि प्रत्यक्ष शाळाभेटी देऊन पुरस्कारप्राप्त शिक्षकांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे आणि शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
मुंबई : आज एआयकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचा फायदा देखील आहे, आणि प्रचंड तोटे आहेत. ते भाषण सुद्धा तुम्हाला हव्या तेवढ्या मिनिटाचे करून देते, मेंदु देखील चालवावा लागत नाही. चॅट जिटीपी प्रोजेक्ट छान करते, पण त्यातून आपण खरच शिकणार आहोत का? सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे. त्यात ओपन बुक संकल्पना आहे, पण त्याचा वापर ज्याने पुस्तक वाचले आहे, तोच करू शकतो. त्यामुळे आता फेलोशिपकडे वेगळया नजरेने पाहण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
आदरणीय पवार साहेबांच्या सहस्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिल्या जाणाऱ्या फेलोशिप प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. फेलोशिप चे हे पाचवे वर्ष असून गुणवत्ता असूनही अनेक जण संधी नसल्यामुळे पुढे येत नाहीत, त्यांना न्याय देण्यासाठी ही फेलोशिप सुरु करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या वर्षी कृषी साठी ४०, साहित्य साठी १२ आणि शिक्षण फेलोशिप साठी ३० अशा एकूण ८२ फेलोंची निवड करण्यात आली असून यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व यशस्वी फेलोंना फेलोशिप प्रदान करण्यात आली.
डॉ.एस.एस.मगर, नेहा कुलकर्णी, निलेश नलावडे, विलास शिंदे, प्रा.डॉ.नितीन रिंढे, अदिती नलावडे, यांच्यासह चव्हाण सेंटरचे पदाधिकारी, फेलोज, त्यांचे पालक आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
आपण एक वर्षासाठी फेलोशिप देत आहोत, पण त्या फेलोंना एक वर्षानंतर देखील मार्गदर्शन किंवा मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. अनेकजण वेगवेगळे प्रयोग करत असतात, फक्त त्यांना एक व्यासपीठ मिळण्याची गरज असते. त्यामुळे नवीन फेलोनी नवीन काहीतरी घडवावे. नवीन धोरणाच्या माध्यमातून तुमच्या जीवनात चांगला बदल घडला पाहिजे, त्याचबरोबर समाजातही चांगला बदल घडला पाहिजे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. यश अपयश येत राहते, पण प्रयोग थांबले नाही पाहिजेत. त्यामुळे एक ध्येय ठेवून काम करत रहा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
विज्ञान तंत्रज्ञान, एआय कितीही विकसित झाले तरी आनंद आणि सुखासाठी माणसेच लागतात, आणि हीच माणसे जोडण्याचे काम यशवंतराव चव्हाण सेंटर करत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच फेलोशिपसाठी ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,बारामती, एम.के.सी.एल. फाऊंडेशन आणि सह्याद्री फॉर्म्स नाशिक यांचे सहकार्य लाभत आहे, त्याबद्दल त्यांचे आभारही त्यांनी मानले.
मुंबई, ता. २५: खेड्यापाड्यातल्या लोकांना त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याच्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं करण्याच्यासाठी 'युसुफ मेहेरअली' संस्थेने आणि सगळ्या सहकाऱ्यांनी अविरत कष्ट केले आणि ही संस्था एका उत्तम पातळीवर आणून पोहोचवली. ज्या ज्या वेळेला देशामध्ये संकट आलं, अडचणी आल्या त्या वेळेला 'युसुफ मेहेरअली सेंटर' तिथे धावून गेलं आणि आपली जबाबदारी ही त्यांनी लोकांना दाखवली, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिले जाणारे ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०२५’ ‘युसूफ मेहेरअली सेंटर, तारा’ यांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, मला अतिशय आनंद आहे की, या वेळेला डॉ. काकोडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने निवड केलेली संस्था 'युसुफ मेहेरअली' एक अतिशय उत्तम सेवाभावी वृत्तीची ही संस्था आहे आणि त्याची निवड त्यांनी केली.माझा आणि जी. जी. पारखांचा घनिष्ठ संबंध होता, ते हल्लीच गेले. पण अगदी गेल्या वर्षीपर्यंत दर महिन्याला काही ना काही प्रश्नांच्या निमित्ताने दोन-तीन वेळेला ते माझ्याकडे येत असत, काही प्रश्न मांडत असत. इतकं वय झाल्याच्यानंतरसुद्धा कष्ट करायला ते कधी मागे पुढे राहिलेले नाही. अखंड प्रयत्न करत राहिले आणि 'युसुफ मेहेरअली' या संस्थेच्या संबंधी त्यांना प्रचंड आस्था होती. युसुफ मेहेरअली स्वतःच थोर नेते होते, मुंबईचे महापौर होते. दुर्दैवाने त्यांना आयुष्य जास्त मिळालं नाही. पण जे काही मिळालं ते समाजाच्या उभारणीसाठी त्यांनी ते आयुष्य घालवलं. ते गेल्याच्यानंतर जी. जी. पारीख असोत, मधु दंडवते असोत, अनेक डाव्या चळवळीचे नेते असोत. या सगळ्यांचा सहभाग युसुफ मेहेरअली यांच्या संस्थेशी गेली अनेक वर्ष होता.
कार्यक्रमात चव्हाण सेंटरच्या भविष्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जागर उभा केला होता. ही संस्था महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची आहे. सध्या शिक्षणात एआयचा प्रभाव वाढतो आहे. पुढील पाच-दहा वर्षांची वाटचाल कशी असेल, याचे चिंतन आम्ही करत आहोत. सेंटरच्या ग्रंथालयाची सदस्यता वाढली आहे, ही आश्वासक बाब आहे. महिला सबलीकरणासाठी नियोजन करत आहोत. तंत्रज्ञान बदलत असले तरी अंधश्रद्धा आणि हुंडाबळी वाढत आहेत. याविरोधात काम करण्याची गरज आहे.
यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर, भालचंद्र मुणगेकर, मधू मोहिते, नितीन आणेराव, कार्यक्रम प्रमुख दत्ता बाळसराफ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यावेळी डॉ.अनिल काकोडकर यांनी केली. प्रोफेसर अनिल गुप्ता यांना १२ मार्च २०२६ रोजी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."





नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.