स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
छत्रपती संभाजीनगर, दि. ३० : समृद्ध समाज निर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून शेती, युवक, महिला, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात खूप मोठे सामाजिक कार्य सुरू आहे. या माध्यमातून सपर्पित भावनेने, लक्ष केंद्रित करत, जिद्द, चिकाटी, मेहनत घेत, अडचणीत तग धरून राहत, सकारात्मक आणि सातत्य ठेवत काम करणारी ही आजची तरुण पिढी ससर्वांसाठी प्रेरक आहे. भारताचे उद्याचे भविष्य असणाऱ्या तरुणाईस आज यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार देत असताना अभिमान वाटतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी विविध क्षेत्रात विधायक, भरीव व विशेष कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींना दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्याचे आज एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, कार्यकारिणी सदस्य डॉ.अपर्णा कक्कड, लेखक दासू वैद्य, संयोजक नीलेश राऊत, केतकी नेवपुरकर, गौरव सोमवंशी,विभागप्रमुख संतोष मेकाळे व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. टोपे म्हणाले, आज विविध क्षेत्रात काम करणारे हे सगळे तरुण समाजाच्या भल्यासाठी काम करत आहेत. विशेषत: सामान्य नागरिकांचे जीवन सुखमय आणि आनंददायी होण्यासाठी ही तरुणई आपापल्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत सातत्यपूर्ण कार्यरत आहे. या सर्वांनी आपल्या कामांतून ‘नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा’ हाच संदेश दिलेला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करणाऱ्या सर्वांना प्रेरणा आणि बळ देण्याचे काम करत आहे.
आज विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या या सर्व पुरस्कार प्राप्त तरुणाईचे मी मनापासून अभिनंदन करतो. भारताला संतांच्या विचारांची फार मोठी परंपरा आहे. भगवान बुध्दाने उदात्त धर्माची दिलेली शिकवण जगासाठी मार्गदर्शक ठरलेली आहे. अशा समृद्ध विचार परंपरा लाभलेल्या देशात जाती धर्माच्या नावाने होणारे वाद बघून मन विषन्न होतं. वडीलधाऱ्या माणसाने तरुणांना या विषयी योग्य मार्ग दाखवला पाहिजे. आपण कुठे चुकत आहोत, हे दाखवून दिले पाहिजे. यशवंतराव चव्हाण सेंटरने यासाठी पुढील काळात काम केले पाहिजे. संधीची नवनवीन क्षितिजे उपलब्ध होत असताना आता या तरुणांनी न थांबता, अथक परिश्रमातून नवनवीन विक्रम स्थापित केले पाहिजेत, असे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांनी यावेळी सांगितले.
मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यावेळी बोलताना म्हणाले, आज यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्राप्त करणारे सगळे युवक युवती समाजाच्या भल्यासाठी अनेक महत्वाच्या विषयावर काम करत आहेत. माध्यमे याची दखल घेत असतील किंवा नाही. मात्र, आज यशवंतराव चव्हाण सेंटरने यांच्या कामाची दखल घेतली आहे. आपली आवड जोपासत ही सगळी तरुण मंडळी आपले सर्वस्व झोकून देऊन काम करत आहेत. या अशा समाजातील तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तींमुळे महाराष्ट्र चालतो आहे.
आज झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ७ विविध विभागांमध्ये एकूण १६ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील युवकांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक नीलेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री मुळे हिने केले तर आभार विभागप्रमुख संतोष मेकाले यांनी केले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
पुणे, दि.२८ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या यशस्विनी सन्मान पुरस्काराची घोषणा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. येत्या २२ जून रोजी बालगंधर्व रंगमंदिर ,पुणे येथे सकाळी १०.३० वाजता या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता, क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा जणींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या महिला धोरणाला २२ जून रोजी ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. स्त्रीकेंद्री आत्मभान जपत मराठी साहित्यात आपली ओळख निर्माण करणाऱ्या लेखिका श्यामला गरुड (छत्रपती संभाजीनगर) यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान'. विघ्नहर्ता महिला ग्रामीण विकास संस्था चालवणाऱ्या पर्यावरणस्नेही मनीषा पवार (गडचिरोली) यांना 'यशस्विनी कृषी सन्मान'. आदिवासी, दलित, महिला, शेतमजूर, भूमिहीन इत्यादी वंचित व असंघटित श्रमिकांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या उल्काताई महाजन (रायगड) यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान’. विविध माध्यमातून आपली पत्रकारितेची छाप समाजमनावर उमटवणाऱ्या अलका धुपकर (मुंबई) यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान’. सर्व महिलांना सोबत घेऊन शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वीपणे करणाऱ्या कमल कुंभार (धाराशीव) यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान’. कुस्ती या खेळातील निष्णात महिला प्रशिक्षक शबनम शेख (अहिल्यानगर) यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून या सहाही क्षेत्रात अत्यंत तळमळीने काम करत योगदान देणाऱ्या या सहाजणींना पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने संपूर्ण देशात प्रथमच सन १९९४ साली महिला धोरण जाहीर केले. या महिला धोरणाला यंदा ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. ते जाहीर करण्याची तारीख २२ जून हीच होती. ते औचित्य साधून या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यभरातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता आणि क्रीडा प्रशिक्षण या क्षेत्रांतून अनेक महिलांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर या सहा 'यशस्विनी' मिळाल्या असून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करत आहोत, असे त्यांनी नमूद केले.
मुंबई - देशभरातील आरोग्य व्यवस्था सक्षम आणि सुदृढ होण्यासाठी आरोग्य सेवाबचे सुलभीकरण आणि लोकशाहीकरण होणे आवश्यक आहे, असे मत डॉ. अभय बंग यांनी मांडले. यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, सरचिटणीस हेमंत टकले, श्री. विवेक सावंत, चव्हाण सेंटरच्या कोषाध्यक्ष अदिती नलावडे, विश्वस्त अजित निंबाळकर, राजेश टोपे, दिलीप वळसे - पाटील, बी.के. अगरवाल, डॉ. समीर दलवाई, रामदास भटकळ, शिक्षण तज्ज्ञ फरीदा लांबे, चव्हाण सेंटरचे पदाधिकारी, इतर सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. बंग बोलत होते, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारताना मनामध्ये थोडीशी धाकधूक आहे. कारण, आजपर्यंत या पुरस्कारांच्या यादीमध्ये अनेक दिग्गज मान्यवरांचा समावेश आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज माणसाच्या नावाने हा राष्ट्रीय पुरस्कार मिळतो आहे आणि त्यांचे वारस म्हणून ज्यांना मानलं जातं, त्या शरद पवारांच्या हस्ते हा पुरस्कार मिळतोय, याचा वेगळा आनंद आहे. म्हणून या राष्ट्रीय पुरस्काराचा आम्ही दोघेही कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो. गडचिरोली सारख्या भागात स्टीलचा उद्योग सुरू होत आहे. किती चांगली लोहखनिज मिळते. त्यामुळे उद्योगधंद्यांच्या बाबतीत तेथे अनेक बदल होत आहेत. या बदलांच्या विरोधात आम्ही नाही. मात्र, तेथील आदिवासी बांधवांचे काय? त्यांच्या मूलभूत प्रश्नांचे काय? त्यांच्या रोजगाराच काय? त्यांच्या शिक्षणाचे काय? किती आदिवासी बांधवांना तेथे रोजगार मिळू शकेल? असेही काही मूळ प्रश्न आहेत. यावरही सकारात्मक चिंतन किंवा विचार विनिमय होणे गरजेचे आहे. अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
पुरस्काराचे मानकरी ठरविण्यासाठी, विख्यात अणुशास्त्रज्ञ, डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पुरस्कार निवड समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये SNDT विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. रूपा शाह, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, अर्थशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत श्री. विवेक सावंत, आर्किटेक्ट आय.एम. काद्री हे सदस्य म्हणून काम पाहतात. रु. ५ लाख, मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी डॉ. अनिल काकोडकर यांनी पुरस्कारासंबंधीची माहिती दिली. संशोधक, सामाजिक कार्यकर्ता, गांधीवादी विचारांचा मिलाप असणारे डॉ. अभय बंग हे आदिवासींसाठी विधायक काम करत आहेत. सोबतीला त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग या देखील आहेत. या दोघांना देखील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, असे सांगून डॉ. काकोडकर यांनी बंग दाम्पत्याच्या कार्याचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र पवार म्हणाले की, डॉ.राणी बंग व डॉ.अभय बंग यांच्या कामाची नोंद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. त्यामुळे त्यांच्या सारख्या सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या दांपत्याला आज कृतज्ञता म्हणून यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दिला जात आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. प्रकृती ठिक नसल्यामुळे डॉ.राणी बंग उपस्थित राहू शकल्या नाहीत. पण, त्यांचा संदेश आपण ऐकला. त्यात त्यांनी हा पुरस्कार सर्व लोकांचा आणि या सगळ्या प्रवासात सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, आज डॉ.राणी बंग आणि डॉ.अभय बंग पती-पत्नीला हा पुरस्कार दिला जात आहे. तोही यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने. त्यामुळे ही निवड अतिशय सार्थ आहे, असे मला वाटते. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला. महाराष्ट्राचा चेहरा कसा बदलता येईल? हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे महाराष्ट्राला आणि देशाला दिशा मिळाली. त्यामुळे त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार योग्य व्यक्तींना दिला जात आहे, याबद्दल निवड समितीचा आभारी आहे. चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष श्री. अरुणभाई गुजराथी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सेंटरचे सरचिटणीस, हेमंत टकले यांनी पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले.
विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.