स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारे ‘‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता पुरस्कार’ घोषित करण्यात आले. सहा ज्येष्ठ नागरिक आणि एका ज्येष्ठ नागरिक संघाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून येत्या ऑक्टोबर मध्ये मुंबई येथील चव्हाण सेंटर येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. कोल्हापूर येथील सुशीला ओडेयर, सांगली येथील चेलनादेवी खुरपे, पुणे येथील अरुण रोडे, छत्रपती संभाजी नगर येथील रमेश दुसे, चंद्रपूर येथील श्रीराम पान्हेरकर, मुंबई येथील सलमा खान यांना 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार' देण्यात येणार आहे. तर यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था कृतज्ञता सन्मान लातूर येथील ज्येष्ठ नागरिक संघास घोषित करण्यात आला आहे.
चव्हाण सेंटरच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या आनंद मेळाव्यात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून नि:स्वार्थपणे काम करत समाजाच्या जडण घडणीमध्ये योगदान देणाऱ्या सहा ज्येष्ठांना व एका ज्येष्ठ नागरिक संघाचा सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवानिवृत्त झाल्यानंतर, आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत; त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघ देखील आहेत. जे कोणत्याही स्वार्थाशिवाय कार्य करीत आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान व्हावा हा या पुरस्काराचा उद्देश आहे,असे त्यांनी नमूद केले.
मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने यावर्षीपासून शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण) सुरू करण्यात आली आहे. यासाठी एकूण दहा फेलोंची निवड करण्यात आली असून संकेत स्थळावर त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' १२ डिसेंबर २०२१ या वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत कृषी, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाते. यावर्षीपासून प्रथमच बालशिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण) सुरू करण्यात आली आहे. फेलोशिपसाठी राज्यभरातून ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. २४ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान अर्ज मागविण्यात आले होते. यास राज्यभरातून भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातूनच एकूण १० फेलोंची निवड केली आहे, अशी माहिती चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत वय वर्षे ३ ते ८ या कालावधीला शिक्षणाचा ‘फाऊंडेशनल स्टेज’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ताराबाई मोडक, अनुताई वाघ, सिंधूताई अंबिके यांसारख्या थोर व्यक्तींनी बालशिक्षणाचे पायाभूत काम केले आहे. आज अंगणवाडी सेविका, मदतनीस, सुपरवायझर, CDPO आणि सहकारी हे काम पुढे नेत आहेत. या क्षेत्राला संशोधनाची जोड देण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरने ही फेलोशिप सुरू केली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील बालशिक्षण अधिक सुदृढ होईल.असे खासदार सुळे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले.
बालशिक्षण फेलोशिपसाठी निवड झालेल्या फेलोंची नावे https://www.sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावर पाहता येतील. या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार सुळे यांनी सर्वांचे आभार मानून फेलोशिप मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन केले असून यावर्षी फेलोशिप न मिळालेल्या उमेदवारांनी निराश न होता; पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
निवड झालेल्या फेलोंची यादी खालीलप्रमाणे
पुणे - महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी दिली, की महिला तिचं सोनं करतात, याची खात्री होती. म्हणूनच संपूर्ण देशभरात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरण आणले, असे सांगून महिलांचे कर्तृत्व नाकारणाऱ्या देशाची प्रगती होऊ शकत नाही, अशा शब्दात खासदार शरद पवार यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील सहा यशस्विनींचा आज लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख आणि धैर्यकन्या आसावरी जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील डाॅ. श्यामल गरुड यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान', गडचिरोली येथील मनिषा सजनपवार यांना 'यशस्विनी कृषी सन्मान', रायगड येथील उल्काताई महाजन यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान', मुंबई येथील अलका धुपकर यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान', धाराशिव येथील कमल कुंभार यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान' तर अहिल्यानगर येथील डाॅ. शबनम शेख यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान' या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सन्मानपत्र, यशवंतराव चव्हाण यांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच या कार्यक्रमात हुंडामुक्त महाराष्ट्र, हिंसामुक्त कुटुंब जागर जाणिवांचा तुमच्या माझ्या लेकींचा या राज्यव्यापी अभियानाच्या माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, अंकुश काकडे, निर्मलाताई सामंत प्रभावळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, स्वाती पोकळे, भारती शेवाळे राज्यातील चव्हाण सेंटरचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच राज्यभरातून आलेल्या महिला भगिनी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
खासदार शरद पवार यांनी यावेळी बोलताना राज्यात महिला धोरण आणताना झालेला विरोध, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि त्या सर्वांवर मात करत महिला धोरण कसे लागू केले आणि हळूहळू त्यांचा तो निर्णय कसा लोकांना आवडू लागला यावर सविस्तर विवेचन केले. त्याचबरोबर आजही महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत असे सांगताना पुरुषी मानसिकता सोडून देण्याची गरज असल्याचे मत मांडले.
लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी 'बायांनो रुसणे सोडू नका' ही कविता म्हणत महिलांच्या हक्कांवर भाष्य केले. तर आसावरी जगदाळे यांनी पहलगाम हल्ल्यावेळी आलेले अनुभव सांगताना प्रत्येकाने आपापल्या परीने देशसेवा केली पाहिजे, असे आवाहन केले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना हुंडाबळी आज देखील होत आहेत, याबद्दल खंत व्यक्त करताना समाज म्हणून आपण आत्मचिंतन केले पाहिजे, असे सांगताना हुंड्यासारख्या प्रथा नष्ट करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग असायला हवा, असे आवाहन केले. त्याचबरोबर जुलै महिन्यात हुंडामुक्त समाजासाठी महाराष्ट्रात अभियान राबवणार असल्याचे सांगितले. पुरस्कारार्थी सहाही यशस्विनीनी यावेळी पुरस्काराप्रती आपल्या भावना व्यक्त करतानाच त्या त्या क्षेत्रात त्या करत असलेल्या कामांची माहिती दिली. सेंटरचे पुणे केंद्र सचिव अंकुश काकडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. राजमाला बुट्टे पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.