मुंबई -यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा कविवर्य ना. धों. महानोर स्मृती साहित्य तसेच शेती-पाणी पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच मुंबईतील चव्हाण सेंटरमध्ये उत्साहात पार पडला. यंदा या पुरस्काराचे तिसरे वर्ष असून, साहित्यातील चार आणि शेती-पाणी क्षेत्रातील दोन अशा एकूण सहा मान्यवरांना गौरविण्यात आले. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, विचारवंत डॉ. सुधींद्र कुलकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करत महानोरांच्या समृद्ध आठवणींना उजाळा दिला. महानोरांचे विचार आणि कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जैन कुटुंबीयांच्या शेतीविषयक योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अपरिहार्य कारणास्तव प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकलेले ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रफितीद्वारे मनोगत व्यक्त केले. महानोरांच्या साहित्याने निसर्गासोबतच ग्रामीण भागातील शेती, पाण्याचे दुर्भिक्ष्य, शेतकऱ्यांचे कष्ट, महिलांचे संघर्षमय जीवन आणि नात्यांमधील दाहकता प्रभावीपणे मांडली, असे सांगत त्यांनी पुरस्कारार्थींना अखंड साहित्यसेवेचा संदेश दिला. यंदाच्या पुरस्कारांमध्ये साहित्य विभागात अविनाश उषा वसंत (मुंबई), श्रीकांत साव (चंद्रपूर), प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी (बुलढाणा) यांना काव्यलेखनासाठी, तर विठ्ठल खिलारी (सातारा) यांना कादंबरीसाठी सन्मानित करण्यात आले. शेती-पाणी व्यवस्थापनातील उल्लेखनीय कार्यासाठी वैशाली पाटील (रावेर, जळगाव) आणि सीमा क्षीरसागर (कडवंची, जालना) यांना गौरवण्यात आले. या पुरस्कारांची निवड अशोक जैन, डॉ. जब्बार पटेल, डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. नितीन रिंडे, अजित भुरे, रमेश जाधव, शंभू पाटील आणि दत्ता बाळसराफ यांच्या निवड समितीने केली.
सोहळ्यात महानोरांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच शंभू पाटील आणि सहकाऱ्यांनी 'परिवर्तन, जळगाव' निर्मित संत कबीरांच्या तत्त्वज्ञानावर आधारित 'हंस अकेला' हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. दत्ता बाळसराफ यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास युवराज मोहिते, प्रा. श्रीकांत देशमुख, प्रकाश होळकर, अशोक नेमाडे, राजश्री शिंदे, 'शबदालय'च्या सुमती लांडे, पत्रकार प्रशांत पवार, सरला महानोर, महानोर कुटुंबीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




