मुंबई - तत्कालीन मुख्यमंत्री मा. शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने २२ जून १९९४ रोजी देशातील पहिले क्रांतिकारी महिला धोरण जाहीर केले होते. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे धोरण एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरले. या ऐतिहासिक महिला धोरणाला यंदा ३२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने सामाजिक कार्य, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता आणि क्रीडा प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या पुरस्कारांचे यंदाचे हे पाचवे वर्ष होते.
१७ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, “महिलांचा निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढल्याशिवाय सामाजिक परिवर्तन शक्य नाही. महिलांना समान हक्क व अधिकार मिळाले पाहिजेत, जेणेकरून त्या निर्णय प्रक्रियेत अधिक प्रभावीपणे सहभागी होऊ शकतील.” पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “आज समाज अंधश्रद्धेकडे झुकत असताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुरोगामी विचार अंगीकारणे काळाची गरज आहे. हे विचार जिवंत राहिले तरच समाज बुवाबाजी व अनिष्ट रुढी-परंपरांमध्ये अडकणार नाही. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी प्रत्येकाने स्वबुद्धी आणि विवेकाचा वापर केला पाहिजे.” पुरस्कारप्राप्त महिलांचे अभिनंदन करताना, “यशस्विनी म्हणून सन्मानित झालेल्या महिलांनी आपल्या कार्याचा आदर्श ठेवून इतर महिलांसाठी नवे उपक्रम सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
या सोहळ्यात वैशाली घुगे यांना ‘यशस्विनी कृषी सन्मान’, सुनंदा भोसेकर यांना ‘यशस्विनी साहित्य सन्मान’, प्राची जागुष्टे-महाजन यांना ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान’, मालती सगणे यांना ‘यशस्विनी सामाजिक सन्मान’, प्रगती बाणखेले यांना ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान’ तर सविता मराठे यांना ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, रेखाताई नार्वेकर पुरस्कृत ‘युवा यशस्विनी पुरस्कार’ ॲड. परिक्रमा खोत यांना प्रदान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सर्व पुरस्कारप्राप्त महिलांनी यशवंतराव चव्हाण सेंटरबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार प्रगती बाणखेले यांनी वाढती अंधश्रद्धा, महिला सुरक्षा आणि प्राथमिक शाळा बंद होणे यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले. लेखिका सुनंदा भोसेकर यांनी ‘इतिहास जसा आहे तसाच वस्तुनिष्ठपणे मांडला गेला पाहिजे’ अशी भूमिका मांडली. ॲड. परिक्रमा खोत यांनी पीडित महिलांच्या हक्कासाठी व न्यायासाठी सुरू असलेला लढा यापुढेही अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सातत्याने काम करण्याची गरज मालती सगणे यांनी प्रतिपादित केली. वैशाली घुगे यांनी सेंद्रिय शेतीचा व्यापक प्रसार करण्याचा मानस व्यक्त केला, तर प्राची जागुष्टे-महाजन यांनी भविष्यातही निस्वार्थ भावनेने कार्य सुरू ठेवण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमास चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, अजित निंबाळकर, बी. के. अग्रवाल, विवेक सावंत, श्रीमती अदिती नलावडे, प्रा. फरिदा लांबे, प्रा. प्रज्ञा दया पवार आणि हर्षवर्धन देशमुख यांच्यासह यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त, पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले; याप्रसंगी त्यांनी चव्हाण सेंटरच्या प्रदीर्घ वाटचालीतील महत्त्वाच्या टप्प्यांचा आढावा घेतला.




