जीवनातील विविध भावभावनांचे आविष्कार सामाजिक प्रश्‍न,जीवन जाणिवा,निवडणूक यावर कवींनी कवितांतून भाष्य केले. कविता हे माध्यम जगण्याच्या सर्व शक्यता अशक्यांना स्पर्श करतं आणि अनुभवाचा आविष्कार प्रखरपणे समोर आणते,याचीच ही प्रचिती होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई, नाशिक विभागीय केंद्राच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ,जागर कवितेचा - खुले कवी संमेलना,चे आयोजन करण्यात आले होते.
कवि संमेलनाचे स्वागत व प्रस्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. ते म्हणाले की,कवी हा वर्तमानकाळाचा व समाज परिवर्तनाचा भाष्यकार असतो. तो आपल्या कवितेच्या माध्यमातून समकालाचे प्रश्‍न मांडतो. कविता लेखन ही साधना असून त्यातून वेगळा आशय व विचार मांडण्याची गरज आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी भीमराव कोते,विलास पगार,सदाशिव खांदवे व रामचंद्र काकड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कवी संमेलनाची सुरुवात अरुण सोनवणे यांच्या गझलने झाली. भंगूर जीवनाची नाही कुणास खात्री,सारे इथे उतारु,सारेच तीर्थयात्री...त्यानंतर रविंद्र मालुंजकर यांनी ,लेक लाडकी सर्वांची,लेक सावली विश्वाची,तिच्या आगमन वाजे रोज तुतारी सुखाची...या कवितेतून लेकीचे महत्त्व विशद केले. राज शेळके यांनी ,तिच्या डोक्यावर हात तुझी लाखाची कमाई सारं आयुष्य सरुन पुन्हा उरते रे आई...या कवितेतून आईचे थोरपण मांडले. नंदकिशोर ठोंबरे यांनी ,होय मी ब्ल्यु कॉलर मला लाज नाही वाटत त्याची माझी कॉलर ब्ल्यू असली तरी...,यातून विदारक वास्तव मांडले.
कवी संमेलनात अमोल चिने,डॉ.गणेश मोगल,डॉ.एच.एस.मोरे,सुभाष सबनीस,अजय बिरारी,राधाकृष्ण साळुंके,नितीन कोकणे,गणेश पवार,भारती देव,लक्ष्मीकांत कोतकर,माणिकराव गोडसे आदी कवींनी कविता सादर केल्या.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक