आकाश टाले

युवा सामाजिक पुरस्कार
2024

मानवतेचा खरा धर्म म्हणजे लोकांच्या मनात प्रकाश पसरवणे. काही जण ते शब्दांनी करतात, काही जण कृतीने करतात तर काही जण आकाश सारखे असतात ज्यांचे संपूर्ण समर्पण असते.

उपेक्षितांना न्याय, भुकेल्यांना अन्न आणि निरक्षरांना शिक्षण या त्रिसूत्रीवर आकाश यांचा सामाजिक कार्याचा प्रवास चालू ठेवला आहे. सामाजिक संघर्षातून उठून आकाश या काजव्याने हजारो लोकांना प्रकाश देण्याचे काम केले आहे.

कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून २० डिसेंबर २०१७ रोजी, आपल्या मित्रपरिवाराच्या सहाय्याने ‘भरारी फाउंडेशन’ ची स्थापना केली. विश्वास आणि आपुलकीच्या जोरावर या युवांनी समाजात जागरुकता निर्माण करण्यापासून ते तळागाळात बदल घडविण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. आपल्या या संस्थेच्या माध्यमातून अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, शेतकरी आत्महत्या, हुंडाबळी, बेरोजगारी, समाजातील अनिष्ठ चालिरिती या साऱ्यांच्या विरोधात प्रचंड जनजागृती करण्याचा त्यांचा मानस आहे.

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, जगतगुरू तुकोबाराय, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी जो मानवतेचा मंत्र स्वीकारला होता त्याच मंत्रावर माझ्या आयुष्याची वाटचाल असेल आणि याच वाटेने मी अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार आहे, असे ते ठणकावून सांगतात. आकाश यांना प्रबोधनाची खऱ्या अर्थाने आवड निर्माण झाली ती सप्तखंजेरीचे जनक सत्यपाल महाराज यांच्यामुळेच ! अवघ्या ७-८ वर्षाच्या छोटयाश्या वाटचालीत ८०० हुन अधिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महापुरूषांचे आणि राष्ट्रसंताचे विचार जनमानसात त्यांनी पोहोचवले आहेत.

ज्या समाजाने आपल्याला एवढं दिलं त्या समाजाप्रती आपलंही काही देणं आहे आणि आकाश यांनी सर्वकाही देण्याचा निर्णय घेतला.

आकाश टाले यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery

Yashwantrao Chavan Digital Media