
- Awards Content:
- वर्ष: २०२५ , पुरस्कार प्रकार: यशस्विनी पत्रकारिता सन्मान, District: पुणे
सिंधुदुर्गच्या पिंगुळी गावात जन्मलेल्या अलका यांनी कुडाळ, पानवळ आणि वेंगुर्ला येथे शिक्षण पूर्ण केले. राज्यशास्त्रात बी.ए., पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुण्यातून पत्रकारितेचा डिप्लोमा आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्या सध्या एम.जी. एम काॅलेज, छत्रपती संभाजी नगर येथे पीएचडी करत आहेत. “विचारवंतांच्या हत्या आणि त्याचा भारतीय लोकशाहीवरील परिणाम” याविषयावर पी.ए.डी. संशोधन करत आहे.
दोन दशकाहून अधिक काळ पत्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या अलका धुपकर सध्या टाईम्स ऑफ इंडियाच्या डिजिटल TOI Plus साठी सिनिअर असिस्टंट एडिटर म्हणून काम करतात. याआधी त्यांनी दैनिक महानगर, बेळगाव तरुण भारत, मुंबई सकाळ, मिड-डे, मुंबई मिरर आणि आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीसाठी काम केले आहे.
अलका यांनी राजकीय भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, वातावरण बदल, महिला हक्क, जातीआधारित अत्याचार आणि स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या विषयांवर सखोल वार्तांकन केले. २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांनी गोव्यातील सनातन संस्थेच्या मुख्यालयात जाऊन रिपोर्टिंग केले. २०१८ शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमधील त्यांचे फोटो आणि “अनवाणी पायांची सरकारला भीती का वाटते?” हा प्रश्न फोटोंच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडला.
ग्रामीण भारताशी जोडलेल्या अलका यांनी शहरीकरणातील गरिबांच्या समस्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीच पत्रकारितेतून मांडले. २०२२ मध्ये त्यांनी त्यांच्या पाच मैत्रिणींसोबत ‘कसोटी विवेकाची’ हे कला प्रदर्शन आयोजित करून विचारवंतांच्या हत्यांचा मुद्दा तरुणांपर्यंत पोहोचवला.
रामनाथ गोएंका एक्सलन्सी इन जर्नलिझम, UNFPA लाडली, हमसफर ट्रस्टचा लिखो अवॉर्ड, बाळशास्री जांभेकर दर्पण, सावित्रीबाई फुले यांसारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. २०१५ मध्ये त्यांची सिंगापूरच्या एशिया जर्नलिझम फेलोशिपसाठी निवड झाली होती. अलका धुपकर यांचे पत्रकारितेतील योगदान नव्या माध्यमकर्मींना प्रेरणादायी आहे!
अलका धुपकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान २०२५” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

- Awards Content:
- वर्ष: २०२५ , पुरस्कार प्रकार: यशस्विनी कृषी सन्मान, District: पुणे
मनिषा सजनपवार या गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला येथील पदवीधर असून, त्यांनी ‘विघ्नहर्ता महिला गृहउद्योग’ या नावाने फळ प्रक्रिया उद्योग सुरू केला. मोह, जवस, भुइमुग, मोहा, करंज, मोहरी, काळे तीळ, पांढरे तीळ यांच्यापासून लाकडी घाण्यावर त्या तेलाची निर्मिती करतात तसेच विविध प्रकारची लोणची, आम्बाली सरबत,मोहा सरबत तयार करत त्या जिल्ह्यातील महिलांना व्यवसायासाठी प्रेरित करतात. त्यांनी विघ्नहर्ता महिला ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून बचत गट तयार केले आणि कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनात कुक्कुटपालन, शेळीपालन, गांडूळ खत निर्मिती आणि सेंद्रिय शेती असे व्यवसाय उभारले.
त्यांच्या चार एकर शेतीत तांदूळ हे मुख्य पीक आहे. त्या तांदूळ, तूर दाळ आणि विविध पदार्थ बनवून विकतात. गडचिरोली हर्बल क्लस्टरच्या माध्यमातून हिरडा, बेहडा, आवळा, कडूनिंब, पळस फूल यांसारख्यावर प्रक्रिया करून पावडर आणि तेल तयार करतात. या क्लस्टरमध्ये एकूण १८० महिला असून त्यापैकी १५० आदिवासी महिला आहेत. मनिषा यांनी १२ बचत गट तयार करून गावातील महिला-पुरुषांना शेती उत्पादनांवर प्रक्रिया आणि विक्रीसाठी प्रोत्साहित केले आहे.
प्रशिक्षणातून त्यांनी लोणच्याची शेल्फ लाइफ वाढवण्याचे तंत्र शिकले, ज्यामुळे बाजारात मागणी वाढली. त्यांचे पती, मुलगा, कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची त्यांना मोलाची साथ लाभली आहे. त्यामुळे अनेक अडचणींवर मात करून त्या आजही जोमाने कार्य करीत आहेत.
त्यांना स्त्री शक्तीचा उत्सव (२०१४), दत्ता मेघे पुरस्कार (२०१५), आदिवासी शोध यात्रा (२०१९), आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती (२०२५) यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मनीषा यांनी उद्योजकतेचा नवा मार्ग आखला आणि अनेक महिलांना सशक्त केले.
जंगल आणि जमीन यांची सेवा करणाऱ्या मनिषा सजनपवार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी कृषी सन्मान २०२५” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

- Awards Content:
- वर्ष: 2024, पुरस्कार प्रकार: यशस्विनी उद्योजिका सन्मान, District: पुणे
उल्का महाजन यांनी १९८८ मध्ये मुंबई विद्यापीठातून MSW ही पदव्युत्तर पदवी पूर्ण करत सुवर्णपदक मिळवले. त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात १९९० मध्ये रायगड जिल्ह्यातील सर्वहारा जन आंदोलनाच्या स्थापनेपासून झाली. त्या शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढल्या. शोषित जन आंदोलन, रोजगार हमी योजना, नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट्स मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली तसेच भारत जोडो अभियानाच्या महाराष्ट्रच्या समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
आदिवासी, दलित, महिला आणि भूमिहीनांच्या जमीन, पाणी, रोजगार आणि अन्न सुरक्षेसाठी त्यांनी अनेक यशस्वी लढे उभारले. विशेषतः स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसारख्या प्रकल्पांविरोधात त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र आणले. भारत जोडो अभियानातून त्यांनी निवडणुकांमध्ये जनसंघटनांच्या हस्तक्षेपाचे नाविन्यपूर्ण प्रयोग केले.
उल्का यांना ३५ हून अधिक पुरस्कार मिळाले, यात १९९५ चा बिजिंग महिला परिषदेतील युनिफेमचा Future Leader Award आणि मुंबई विद्यापीठाच्या १५० वैशिष्ट्यपूर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत समावेश आहे. पण २०२२ मध्ये त्यांनी एका प्रतिष्ठित आणि आघाडीच्या वृत्तवाहिनीचा पुरस्कार नाकारला; कारण त्या म्हणाल्या, "लोकशाही आणि संविधानाचा अवमान करणाऱ्या सरकारच्या हस्ते सन्मान स्वीकारणे माझ्या तत्त्वांना मान्य नाही." त्यांच्या या बाणेदार आणि लढाऊ वृत्तीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
त्यांनी कोसळता गावगाडा आणि एक विजयी लढा: बलाढ्य कॉर्पोरेटविरोधात ही पुस्तके लिहिली, तसेच अनेक लेख आणि पुस्तिका प्रकाशित केल्या, ज्यांचे जर्मन भाषेत अनुवादही झाले आहेत.
आदिवासी, दलित, महिला, शेतमजूर, भूमिहीन इत्यादी वंचित व असंघटित श्रमिकांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या उल्काताई महाजन यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान २०२५’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

- Awards Content:
- वर्ष: 2024, पुरस्कार प्रकार: यशस्विनी उद्योजिका सन्मान, District: पुणे
कमल कुंभार या धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या एकेकाळी दुसऱ्यांच्या शेतात ७० रुपये मजुरीवर काम करायच्या. १९९९ मध्ये त्यांनी आपल्या बचत गटाच्या माध्यमातून एक नवी सुरुवात केली. त्यांनी कुक्कुटपालन, शेळीपालन, गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय शेतीसह दहा विविध व्यवसाय सुरू केले. यातून त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारला आणि इतर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. आज त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल २१ लाख रुपये असून, त्यातून त्या उत्तम कमाई करत आहेत.
कमल यांनी बांगडी विक्री, स्टेशनरी, साडी व्यवसाय, मेस, लाईट बिल वाटप, सोलार डी-लाइट असे विविध व्यवसाय केले. बचत गटांचे मेळावे, प्रशिक्षण आणि दौरे यातून त्यांनी स्वतःसह इतर महिलांना सक्षम केले. त्यांनी भाड्याने शेती घेऊन एक एकरावर व्यवसायाचे मॉडेल उभे केले. त्यांच्या या कर्तृत्वामुळे आतापर्यंत अनेक महिलांना उद्योजिका बनवण्यात त्यांनी मदत केली, आणि भविष्यात दहा हजार महिलांना उद्योजिका बनवण्याचे त्यांचे ध्येय आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना लक्ष्मी किसान, नारीशक्ती , नीती आयोग , युएनडीपी, फिक्की आणि राष्ट्रपती पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले. कमल यांची इच्छा आहे की, देशभरातील व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी खास विद्यापीठ स्थापन व्हावे. त्यामुळे मुली व महिलांना उद्योग- व्यवसाय उभा करण्यासाठी प्रेरणा, प्रशिक्षण व पूरक वातावरण लाभेल.
स्वतःसह शेकडो महिलांना सशक्त करणाऱ्या कमल कुंभार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान २०२५” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

- Awards Content:
- वर्ष: २०२५ , पुरस्कार प्रकार: यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान, District: पुणे
अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील खेड्यात जन्मलेल्या शबनम यांनी क्रीडा या प्रकारात महिलांची कुस्ती या विषयात पीएच.डी. पूर्ण करणाऱ्या त्या भारतातील सर्वात तरुण भारतीय महिला म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्या भारतीय महिला कुस्ती संघाच्या प्रशिक्षक आहेत आणि कुस्ती खेळात पारंगत आहेत.
पदक तालिकेत त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय महिला कुस्तीपटूंनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवले. २०२३ मध्ये जॉर्डन येथे झालेल्या अंडर- ट्वेंटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताने प्रथमच पदके जिंकली. अल्बानिया येथे अंडर-२३ स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य, तीन कांस्य, तर २०२१ मध्ये सर्बियात एक रौप्य, चार कांस्य पदके मिळाली. २०१९ मध्ये बल्गेरियात कॅडेट स्पर्धेत दोन सुवर्ण, एक कांस्य, तर २०१८ मध्ये उझबेकिस्तानात आशियाई कॅडेट स्पर्धेत सात पदके मिळाली. २०२२ मध्ये फ्रान्समधील जिम्नासियाड स्पर्धेत एक कांस्य आणि २०२३ मध्ये दिल्लीत राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम स्थान पटकावले.
शबनम यांचा विश्वास आहे की, क्रीडामधील महिलांचा सहभाग हा समानता, नेतृत्व कौशल्य आणि महिला सशक्तीकरणासाठी महत्त्वाचा आहे. मैदानी खेळ मुलींचा आत्मविश्वास, शारीरिक-मानसिक बळ व आरोग्य आणि सामाजिक-आर्थिक प्रगती वाढवतात. खेळाडूंना ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करणे, हे त्यांचे ध्येय आहे.
खऱ्या अर्थाने महिला कुस्तीला नवी उंची देणाऱ्या शबनम शेख यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान २०२५” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.