![](/images/Yashaswini%20Samman/5.png)
- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: यशस्विनी क्रिडा प्रशिक्षक सन्मान, District: नाशिक
अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसारख्या अनेक व्यावसायिक क्षेत्रांकडे आजकालच्या मुलांचा ओढा आहे. क्रिडा या क्षेत्राकडे करिअरच्या दृष्टीने अजूनही विचार केला जात नाही. ग्रामीण भागात तर नाहीच नाही. नाशिक येथील रहिवासी शैलजा जैनेंद्रकुमार जैन यांनी समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी होऊन देखील क्रिडा प्रकारातील रुची जोपासली.
आज घडीला शैलजा जैन यांनी तीनशे हून अधिक खेळाडूंना प्रशिक्षित केले आहे. त्यांनी घडवलेले खेळाडू त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात नाव लौकिक मिळवत आहेत. २०१९ मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई खेळात भारतीय महिला कबड्डी संघास प्रशिक्षण दिले, त्याच संघाने सुवर्णपदक मिळविले. इराणच्या राष्ट्रीय महिला कबड्डी संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती तसेच पोलीस विभागाच्या कबड्डी संघास देखील त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. शैलजा जैन यांनी निवृत्ती नंतर देखील खेळाबद्दल असलेले प्रेम कमी होऊ दिले नाही. ग्रामीण भागात जाऊन त्यांनी टॅलेंट हंट राउंडद्वारे ४० मुलींची निवड केली आणि त्यांना नाशिक, महाराष्ट्र येथून दिडशे किमी अंतरावरील वनवासी आश्रम, गुही येथे अनेक प्रशिक्षण सत्रांद्वारे शैलजा यांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
शैलजा यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा २००८ -०९ सालाचा जिजामाता राज्य छत्रपती क्रीडा पुरस्कार, नाशिक जिल्हा प्रशासनाचा २००२ सालाचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
शैलजा जैन यांच्या प्रशिक्षणामुळे आपल्या भारतासाठी अनेक चांगले खेळाडू निर्माण व्हावेत या सदिच्छा. शैलजा जैनेंद्रकुमार जैन यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी क्रिडा प्रशिक्षक सन्मान २०२३’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
![](/images/Yashaswini%20Samman/4.png)
- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: यशस्विनी सामाजिक सन्मान, District: पुणे
शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्रातील महत्वाचे केंद्र म्हणजे पुणे…! अशा या शहरात लोकांची गर्दी वाढत असताना एका बाजूला त्या शहराचे पर्यावरण देखील लक्षात घेतले पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. त्यापैकी ‘कचरा वेचक’ हा एक महत्वपूर्ण घटक आहे. त्यांचे पर्यावरणातील योगदान, कामगार म्हणून त्यांचा दर्जा, शहराच्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका हे देखील महत्वाचे आहे. हीच उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून १९९३ साली पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कचरा वेचकांनी एकत्र येऊन कागद काच पत्र कष्टकरी पंचायत ही संघटना स्थापन केली. या संस्थेच्या मुख्य संस्थापकांपैकी एक म्हणजे “लक्ष्मी नारायणन”! जवळपास १९८९ पासून त्या कचरा वेचणाऱ्यांसोबत काम करत आहेत.
आजच्या घडीला या संस्थेचे नऊ हजार पेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यापैकी ८० टक्के सदस्य हे सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या आणि वंचित वर्गातल्या महिला आहेत. प्रत्येक सदस्य संस्थेला वार्षिक शुल्क आणि त्यांच्या जीवन विमा संरक्षणासाठी समान रक्कम देतो. या संस्थेच्या सदस्यांना पुणे महानगरपालिका मान्यता प्राप्त आय कार्ड दिले जातात आणि ते त्यांच्या कुटुंबासाठी, उदरनिर्वाहासाठी व्याजमुक्त कर्ज घेऊ शकतात तसेच त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक सहाय्यासाठी बाकीच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आजच्या घडीला पुण्यात हिरवे स्वच्छ कोट आणि केशरी पुशकार्ट्स सगळीकडे आहेत कारण ३७०० कचरा वेचक दहा लाख झोपडपट्टीतील रहिवाशांसह पुण्यातील चाळीस लाख नागरिकांना सेवा देत आहेत. अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे ही संस्था पुण्यातील कचरा वेचक समुदायातील बालमजुरी दूर करण्यात, मुलांच्या शिक्षणाला मदत, क्रेडिट, परवडणारी वैद्यकीय सेवा आणि विमा सुलभ करण्यात सक्षम आहे.
कचरा वेचकांचे प्रश्न कायमचे सुटावेत आणि लक्ष्मी नारायणन यांच्या या कार्याची भरभराट व्हावी, या सदिच्छा. लक्ष्मी नारायणन यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी सामाजिक सन्मान २०२३’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
![](/images/Yashaswini%20Samman/3.png)
- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: यशस्विनी उद्योजकता सन्मान, District: नांदेड
कोणताच व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो. व्यवसायाचे छोटे रोपटे कधीतरी लावावे लागते तेव्हा कुठे त्याचे काही कालांतराने वटवृक्षात रुपांतर होते. पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या राजश्री पाटील यांनी उद्योगात पाऊल टाकायचे ठरवले. एक लक्ष ठेवी या उद्देशाने दहा बाय दहा खोलीत सुरु केलेल्या महिला बचत गटाचे रुपांतर आजच्या घडीला ‘गोदावरी अर्बन’ बँकेच्या रुपात आहे.
बचत गटातील महिलांना राज्यातील नॅशनल बँकेमध्ये अपमानास्पद वागणूक, कर्ज मागायला गेल्यावर टाळाटाळ करणे ही सर्व कारणे राजश्री ताईंच्या नजरेस पडली आणि या महिला बचत गटांसाठी आपण स्वत:हून काहीतरी केले पाहिजे. या प्रेरणेतून त्यांनी सहकारी चळवळीचा अभ्यास केला आणि उभी राहिली “गोदावरी अर्बन बँक”! या बँकेच्या आजच्या घडीला महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कनार्टक व गुजरात या पाच राज्यात ९२ शाखा आहेत. राजश्री ताईंच्या प्रयत्नातून आताच गोवा राज्यात देखील परवानगी मिळाली आहे. या बँकेत ४३७ महिला कर्मचारी काम करतात तसेच या उद्योगाच्या माध्यमातून ८० हजार पेक्षा जास्त महिलांना पाठबळ मिळाले आहे.
राजश्री ताई त्यांच्या कार्यातून महिला सशक्तीकरणावर कायम भर टाकत आल्या आहेत. शहरी भागातील उच्चशिक्षित महिलांपासून ते दुर्गम भागातील आदिवासी महिलांपर्यंत ही उद्योगयात्रा पोहचविण्यासाठी राजश्री ताई संपूर्ण महाराष्ट्र्भर फिरत असतात तसेच विविध माध्यमातून या अंधारात लपलेल्या हिरकणींना प्रकाशझोतात आणण्याचे काम देखील त्या करत आहेत.
आदरणीय शरद पवार साहेबांनी आणलेल्या महिला धोरणाचा प्रत्यय राजश्री हेमंत पाटील यांच्या कार्यात पाहायला मिळत आहे. उद्योजिका राजश्री हेमंत पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी उद्योजिका सन्मान २०२३’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
![](/images/Yashaswini%20Samman/2.png)
- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: यशस्विनी साहित्य सन्मान, District: सांगली
असं म्हणतात की साहित्य वाचलं गेलं की संपूर्ण पिढी वाचली जाते. कथा, कादंबऱ्या यातून ही साहित्य परंपरा जपली जाते. सांगलीच्या डॉ. सुनिता बोर्डे -खडसे यांच्या सकस लेखणीतून अवतरलेल्या लिखानामुळे या साहित्य परंपरेत भर पडली आहे.
समाजभान जागृत ठेवून, अस्मिताभान जपत, नकुशा मुलीच्या दुःख-शोषणाच्या जाणीवेतून डॉ. सुनिता यांच्या लेखणीतून ‘फिन्द्री’ ही एक नवी कोरी कादंबरी अवतरली. या कादंबरीचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. डॉ. सुनिता यांनी दैनिक मासिकांमधून देखील चौफेर लिखाण केले आहे. कवितासंग्रह अस्तित्वाचा अजिंठा कोरताना, बालकविता संग्रह भाकरीचा बंगला ही त्यांची गाजलेली प्रकाशने !
श्रीमती सी.बी. शाह महिला महाविद्यालय, सांगली येथे इतिहास विषयाच्या प्राध्यापक म्हणून डॉ. सुनिता बोर्डे कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधन आवडीतून त्यांनी ‘ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातील स्त्रिया’ हा संशोधन ग्रंथ प्रकशित केला. लिखाणाबरोबरच महाराष्ट्रातील अनेक नामवंत बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये सदस्य म्हणून ते काम पाहतात. त्याचबरोबर राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे अधिकारी म्हणून त्यांनी १६ वर्षे काम पाहिले आहे. त्यांची सामाजिक कार्याची आवड त्यांच्या लेखणीतून प्रकर्षाने जाणवते.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि कुसुमाग्रज साहित्य प्रतिष्ठानचा २०१७ सालचा विशाखा काव्य पुरस्कार, २०१८ चा फातिमा शेख आदर्श शिक्षिका पुरस्कार, २०२१ चा विश्वकर्मा साहित्य पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांमुळे त्यांच्या लेखणीला बळ मिळाले आहे.
आपल्या चतुरस्त्र लेखणीतून साहित्याच्या कशा रूंदावणाऱ्या आणि सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेल्या भावना आपल्या साहित्यात जपणाऱ्या डॉ. सुनिता बोर्डे -खडसे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी साहित्य सन्मान २०२३’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
![](/images/Yashaswini%20Samman/1.png)
- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: यशस्विनी कृषी सन्मान, District: कराड, सातारा
शेती आणि माती हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी पिकवतो म्हणून आपण सकस अन्न खाऊ शकतो. जमिनीची सुपीकता, पाण्याची बचत, बीज निर्मिती या सगळ्याभोवती शेती हा विषय फिरतो. आपल्या शेतीतील पिकाचा दर्जा टिकून राहावा, मातीचा दर्जा टिकावा म्हणून गेली २५ वर्षे रासायनिक खतांचा वापर न करता भारती नागेश स्वामी यांनी शेती केली आहे. त्यामुळे जमिनीचा दर्जा टिकून राहिला. “ज्या देशाची वरची चार इंच माती शाबूत आहे तोच देश जिवंत राहू शकतो या जॉर्ज कार्व्हर यांच्या वाक्याने प्रेरित होऊन भारती ताईंचा प्रवास चालू आहे. प्रयोग परिवाराचे श्रीपाद दाभोलकर सरांनी दिलेल्या ‘गणिती , हुकमी ,विक्रमी आपण प्रयोग करूया !’ या विचारांवर त्यांचा प्रवास चालू आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे बीद्र” ! शिक्षण जसे स्वावलंबी झाले पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने स्वावलंबी झाले पाहिजे, यासाठी भारती ताई प्रयत्नशील आहेत.
बियाणांपासून ते मार्केटींगपर्यंत आपण स्वावलंबी कसे व्हावे? हे शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी ‘मोकाट कृषी विद्यापीठाची’ स्थापना केली. शेती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी गावातील मुलांना लहानपणापासूनच शेती आणि माती हा विषय समजून सांगण्यात त्या अग्रेसर आहेत. तसेच त्यांनी महिलांचे बचत गट स्थापन केले आहेत. ‘आधी केले नि मग सांगितले’ या विचारांच्या प्रेरणेतून बीज संकलन ,संवर्धन ,गुणन ,प्रचार ,प्रसार याद्वारे सेंद्रिय शेतीची सुरवात व्हावी या भावनेतून त्यांच्या शेतीचा जीवनप्रवास चालू आहे. “या विश्वाची समृद्धी व तृप्ती आमच्या या गावात आम्हाला मिळो.”अशी त्यांची इच्छा आहे.
शेती आणि माती यांची सेवा करणाऱ्या भारती नागेश स्वामी यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी कृषी सन्मान २०२३’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.